गुढी पाडवा ते राम नवमी, चैत्र नवरात्र साजरी करतात. या दरम्यान रोज वाटत होतं की, देवळात जावं. पण माझ्या ऑफिसच्या विचित्र टाईमिंग मुळे जमलंच नाही. तसं बघयला गेलं तर, आई गेल्यानंतर तेराव्या दिवशी देवळात जाऊन आले, त्यानंतर देवळात गेलेच नव्हते. काल राम नवमी झाली. काल तर रात्री घरी यायला अकरा वाजले. आज शनिवार. विचार केला, आज सुट्टी आहे. आज देवळात जायचंच. देवळात गेलं ना, की आपल्यातल्या ईश्वरी अंशाची जाणीव होते. देवापुढे हात जोडले, की मी नेहमी होते. काय मागायचं ते कळतच नाही. डोळ्यातल्या पाण्यामुळे देवाची मूर्ती धूसर दिसायला लागली, की मागल्या पावली निघून येते. पण तरीही मला देवळात जायला खूप आवडतं. शक्यतो मी कमी गर्दीच्या आणि नवसाला न पावणार्या देवाच्या देवळात जाते. मागायचं काहीच नसतं, मग नवसाला पावणर्या देवळात कशाला जा?
आज सकाळी जागही नेहमीप्रमाणे सहा वाजताच आली. मनात विचार केला, दोन महिन्यात बागेत फिरायलाही गेलेले नाही. आज जरा चक्कर टाकून येऊया. म्हणून झट्पट तयारी करून बागेत गेले. आमच्या ठाण्यात दत्ताजी साळवी निसर्ग उद्यान आहे. खूप वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडे आणि अनेक औषधी वनस्पती तिथे आहेत. हे उद्यान आहे लहानसेच, पण वैविध्यपूर्ण आहे! बागेत गेले, तर सगळीकडे वसंत ऋतूच्या खुणा जागोजागी दिसत होत्या. बागेत शिरल्याशिरल्याच एक छोटंसं तळं आहे, त्यात एक पिवळ्या रंगाचं कमळ नुकतंच उमलत होतं. अर्धवट उमललेलं ते कमळ इतकं सुरेख दिसत होतं! नुकतंच झोपेतून जागं झालेलं, डोळे किलकिले करून बघणारं तान्ह बाळच जणू! त्याच्या बाजूला दोन गुलाबी कमळं पूर्ण उमलली होती. मंद वार्यावर झोके घेत मला जणू सांगत होती, “बघ, आम्ही दोघं कसे लवकर फुलून तयार झालो. तो पिवळ्या अजून अर्धवट झोपेतच आहे!!”
बागेतले माळीदादा, झाडंना पाणी घालायचे काम मोठे मन लावून करत होते. पाण्याचा व मातीचा एकत्रित असा मस्त सुगन्ध येत होता. पाण्यामुळे सर्व झाडांवर एक तरतरी, तजेला आला होता. कितीतरी वेगवेगळी फुले फुलली होती. पांढरा आणि पिवळा कांचन तर फुलांनी अक्षरशः डवरला होता. जांभळ्या, पिवळ्या रंगाची खूप इटुकली फुले(ज्यांची नावे मला माहित नाहीत), गोकर्ण, मुकी जास्वंद, जुई, चमेली…किती सांगू…सगळ्यांना बहर आला होता. सार्वजनिक बागेत फुलांचे असे सुखरूप दर्शन होणे जरा दुर्मिळच गोष्ट आहे! या सगळ्यामधून चालता चालता, कुठेतरी वाचलेला एक जपानी हायकू आठवला,
मी झाडाला विचारलं
“झाडा,झाडा, मला ईश्वराविषयी सांग.”
झाड फुलांनी बहरून आलं…
मी चालता चालता थबकले. आज मी देवळात जायचं ठरवलं होतं ना? मग कुठे आहे मी आत्ता? ईश्वराचे याहून अधिक चांगले दर्शन मला मानवानिर्मित देवळात होईल काय? प्रत्येक फुल, पान, फांदी, झाड मला काहीतरी सांगत होतं का? त्याच्या अस्तित्त्वाच्या खुणांमधून मी चालत होते…कुठल्या देवळात जायचं याचा विचार करत! आतून काहीतरी उचंबळून आलं. आपण किती यंत्रवत झालो आहोत याची जाणीव झाली. मला चालवेचना पुढे! एका बाकावर बसले. सभोवतालच्या झाडा, पाना, फुलांकडे थोड्याश्या असूयेनेच पाहत होते. वाटले किती सहज नैसर्गिकता आहे या सगळ्यांच्यात. ईश्वराने जो जीवनक्रम ठरवून दिला तो अन्तर्गत प्रेरणेने अचूक जाणून घेऊन कित्येक वर्षे ऋतूचक्राच्या फेर्या करत असतात. आंब्याला कोण सांगतं कधी मोहोर यायला हवा, कधी कैरी धरायला हवी आणि कधी आंबा पिकायला हवा? मगर अंडी घालते, त्यातून ७० व्या दिवशी पिल्ले बाहेर येतात. त्या दिवशी मुसळधार पाऊस हमखास असतो. तिला ७० दिवस आधी कोणतं हवामान खातं हवामानाचा अंदाज देतं? गवताचं लहानसं पातंही जर त्याच्या सूचनेप्रमाणे उ’गवत’ असेल, तर मग एव्हढी हुशार माणूसजात, का इतक्या निर्मळपणे वागू शकत नाही? मनुष्य ईश्वराची निर्मिती नाही का? अनेकांची आयुष्य सरत येतात, पण नेमके कशासाठी जन्मलो, हेच उमगलेले नसते. का हे असे व्हावे? आपल्या आतही ईश्वराचा अंश असेलच ना? किंबहुना आहेच प्रत्येकाच्या ठायी तो. मग तो का नाही जाणवत आपल्याला? ह्या ‘हृदयस्थो जनार्दन:’ ला कसा शोधायचा? हृदयाच्या कुठल्या टेस्टमधे सापडेल का? न उलगडणारं कोडं…ज्यांना सुटलं…त्यांना दंडवत
Hi Ashwini , nayana here i didnt know you had such a wonderful blog , khupach awadla, aata regularly follow karin, I too have a food blog kadhi vel milala ki visit kar http://nayanas-kitchen-kreations.blogspot.in/. Khup bara watla tujhe vichar vachun khup varshanni tula bhetlyasarkha vatla…..
Nakki wachen ani recipe karun baghen.
वा सुन्दर. वैशाली, थोडक्या शब्दात नेमकं तुझं म्हणणं मांडलं आहेस. ही प्रचीती निसर्गाच्या सान्निध्यात नेहेमीच येते. माझ्यासारखी देवाच्या बाबतीत कुंपणावर बसलेली लोकं सुद्धा निसर्गाच्या चामत्कारापुढे नतमस्तक होतात. आपण आपली बुद्धी अति वापरली आहे , त्यामुळे आपली नैसर्गिक प्रेरणा आपण हरवून बसलो आहोत.
very very niece